मुरबाड तालुक्यातील ” खाटेघर” गावाचा विकास ,गावासाठी ,की ठेकेदारासाठी ? असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय.
कोणताही ऐतिहासिक वारसा नसलेल्या गावाला पर्यटन विकास चा दर्जा देऊन तेथे कोट्यवधी रुपये खर्च करून केलेले सुशोभीकरण व बांधण्यात आलेल्या मंदिरात देव नसल्याने ते मंदिर गेले दहा वर्षे देवाचे प्रतिक्षेत असल्याने पर्यटन विभागाचे कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
राज्याचे पर्यटन विकास विभाग एखाद्या ठिकाणी असणारे ऐतिहासिक पुरावे लक्षात घेऊन तेथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते म्हणुन त्या ठिकाणाला पर्यटन विकास चा दर्जा देऊन येणाऱ्या पर्यटकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करते.परंतु मुरबाड -नगर मार्गावर असलेल्या खाटेघर नदी च्या पात्राला पर्यटन विकास विभागाने पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन नदीच्या पात्राचे सुशोभीकरण केले.पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे पर्यटकांना सुरक्षित रहावे यासाठी त्याठिकाणी लाखो रुपये खर्चून बेट बांधण्यात आल्याचे कागदी घोडे नाचविले मात्र सुशोभिकरण केलेल्या पर्यटन क्षेत्राकडे पर्यटक आकर्षित व्हावे यासाठी नदीच्या पात्रात उंच असे मंदिर बांधण्यात आले असुन सुमारे दहा वर्षे होऊन ही त्या मंदिरात कोणत्याही देवाची प्रतिष्ठापना केली नसल्याने हे मंदिर देवाचे प्रतिक्षेत आहे.
जर याठिकाणी कोणताही ऐतिहासिक वारसा किंवा देवस्थान नसल्याचा ऐतिहासिक पुरावा नव्हता तर शासनाने या ठिकाणचे सुशोभीकरण करून मंदिराची उभारणी का केली ? हा संतप्त सवाल भक्तगण करीत आहेत. या ठिकाणी झालेल्या सुशोभीकरणात शेजारी असलेल्या आदिवासी वस्ती वर खर्च केले असते तर त्या आदिवासी बांधवांना मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या असत्या व ते समस्या मुक्त झाले असते.
याबाबत मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता कैलास पंतिगराव यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्याचे टाळले.
सदरच्या कामाबाबत सविस्तर माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. असे एस.एम.कांबळे. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे क्र.2 यांनी सांगितले आहे.
संबंधित छायाचित्रे :