प्रतिनिधी/ संदीप द्रौपदी तुकाराम लाड
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावात दि.14 रोजी दिघी गावाचे सरपंच विपुल गोरीवले तसेच त्याच्यासमवेत असंख्य महिलांनी दिघी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन जात सततच्या खंडित होणाऱ्या विजेमुळे अधिकारी वर्गाला धारेवर धरले.
गेल्या अनेक दिवसांपासून दिघी गावातील अनेक ठिकाणी विजेचा खेळखंडोबा पाहायला मिळतं आहे. दिघी मधील अनेक कोळी बांधव, महीला आपल्या पोटापाण्यासाठी मासेमारी चा व्यवसाय करीत असतात त्या मुळे दिवसभर मासे विक्री साठी ह्या महीला विविध गावात फिरतं असतात मात्र संध्याकाळच्या वेळेस घरी आल्यानंतर वीज नसल्याने त्यांना स्वयंपाक करताना अनेक अडचणी येत असतात तसेच हातावर पोट असल्याने इन्व्हर्टर सारख्या सोयी सुविधा घेणे त्यांना परवडणारे नसल्याने संपुर्ण पणाने महावितरण कंपनीच्या विजेवर अवलंबून राहावे लागते.
दिघी गावातील अनेक ग्रामस्थांच्या घरातील विजेवर चालणाऱ्या उपकरणांची देखील सततच्या ये जा होणाऱ्या विजेमुळे खूप मोठे नुकसान झाले आहे ह्याची भरपाई कोण करणार असा सवाल महीला उपस्थित करीत आहेत. त्याप्रमाणे आठवड्यातून अनेक वेळेला दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद केला जातो मात्र दुरुस्ती नंतर देखील सततचा वीज पुरवठा जात असतो जर दुरुस्ती महावितरण करत असते मग त्या नंतरही वीज पुरवठा खंडित होत असेल तर महावितरण नेमक कोणत्या प्रकारची दुरुस्ती ची कामे करते याच गोष्टीचा जाब विचारण्यासाठी असंख्य महिलांनी दिघी महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढीत जाब विचारला मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची उत्तरे त्या ठिकाणीं मिळाली नाही.
येत्या गणेश चतुर्थी पर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर दिघी गावामधून एकही वीजबिल भरला जाणार नाही.
( विपुल गोरीवले ,सरपंच , दिघी)
कंडक्टर बदलण्याचे काम सूरु आहे आठवडाभरात काम पूर्ण होऊन वीज पुरवठा सुरळीत होईल.
( अमितकुमार बोरसे, मुख्य अभियंता, महावितरण श्रीवर्धन.)